भोसरीत बारावीच्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या! अभ्यासाच्या दडपणातून उचलले टोकाचे पाऊल?


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – अभ्यासातील तणाव आणि परीक्षेच्या दबावातून बारावीच्‍या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ६) दुपारी संत तुकाराम नगर, भोसरी परिसरात घडली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रणय सुनील खैरे (वय १७, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रणय हा भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता.

कॉलेजमधील प्रकल्प अपूर्ण राहिल्याने तसेच प्रात्यक्षिक परीक्षा न दिल्यामुळे तो चिंतेत असल्याची माहिती त्‍याच्‍या मित्रांनी व नातेवाईकांनी पोलिसांना दिली. शुक्रवारी प्रणय आईसोबत राजमाता जिजाऊ महाविद्यालयात परिक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. परतल्यानंतर आई बँकेत कामावर गेली, तर वडील गावी गेले होते.

घरात एकटा असताना त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून भोसरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.ही घटना अभ्यासाचा ताण, अपेक्षांचा दबाव आणि संवादाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करते.

मानसोपचार तज्‍ज्ञांचा सल्‍ला घ्‍या

विद्यार्थ्यांना जर परिक्षेचा ताण वाटत असेल किंवा अभ्‍यासामुळे दडपण येत असेल तर त्‍याच्‍या पालकांनी मुलाची मानसिक स्थिती ओळखून त्‍वरीत मानसोपचार तज्‍ज्ञांचा सल्‍ला घ्‍यावा. परिक्षेमुळे पालकांनी विद्यार्थ्यावर अभ्‍यासाकरिता दडपण आणू नये.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!