संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
पुणे – राज्यातील २९ महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल गुरुवारी ‘ईव्हीएम’बंद केला. कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला शुक्रवारी सकाळी १० पासून सुरू होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे.पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप दोन्ही राष्ट्रवादींना धक्का देणार असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. मुंबईच्या निकालाबाबत उत्सुकता असून एक्झिट पोलमध्ये मात्र भाजप-शिंदेसेना महायुती बाजी मारेल असे दिसते.
वाद टाळण्यासाठी आयोगाने ‘टक्का’ जाहीर करणे टाळले
राज्यातील २९ महापालिकांसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.१३% मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मात्र त्यानंतरची मतदानाची टक्केवारी जाहीर करणे आयोगाने टाळले आहे. टक्केवारीवरून होणारे वाद टाळण्यासाठी आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंदाजित टक्केवारीही जाहीर केली नाही.









