संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आतापर्यंत पाच जणांनी उमेदवारीअर्ज दाखल केले आहेत.
पाचही उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास ३० मार्चपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जतमधील सतीश कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टी या पक्षाकडून, सांगोल्यातील राघू घुटूकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साताऱ्यातील शरद भिसे, बुलडाणा येथील गजानन गवळी आणि उल्हासनगर येथील त्रिशला कांबळे यांनी अपक्ष उमेदवारीअर्ज भरला आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा एप्रिलपर्यंत आहे.
सात एप्रिलला अर्जांची छाननी आणि नऊ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. मुदतीनंतर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास २३ एप्रिल रोजी मतदान आणि चार मे रोजी मतमोजणी होणार आहे. आतापर्यंत अर्ज दाखल केलेले पाचही उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवारीसाठी दावा केला नाही, तर काँग्रेस ही जागा लढवण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप काँग्रेसकडून उमेदवारीअर्ज दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.
अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव केला. पोटनिवडणूक न लढविता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार उभा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









